भाजपा महापौर जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे नाव भाषणात घ्यायचं विसरतात..

करोनाच्या काळात राजकारण करू नये असे आवाहन करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या भाजपाच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना अप्रत्येक्षरित्या सुनावल्याचे दिसून आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांचा नामोउल्लेख केला नव्हता. त्यानंतर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत ही बाब लक्षात आणून दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरच्या काल झालेल्या उद्घाटनप्रसंगी ते ऑनलाईन संवाद साधत होते. यावेळी अनेक मान्यवरांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “करोनाच्या लढाईत कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता ही लढाई जिंकायचीच, याच उद्देशाने सर्वजण कामाला लागले आहेत. महापौर यांचं आणि इतरांचे मी मनापासून आभार मानतो. महापौर माई ढोरे आपण सुरुवातीला भाषण केलं. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं नाव घेतलं नाही. मला वाटलं माई नाराज झाल्या. पण, अनावधानाने राहिलं असेल हरकत नाही.” असे म्हणत अजित पवार यांनी ती बाब सर्वांचा निदर्शनास आणली.
पुढे ते म्हणाले की, करोना विषाणूला आपण दूर ठेवले पाहिजे, तसेच वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता ठेवली पाहीजे, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.