महावार्ता दिवाळी 2021
Trending

मुळशी… का आहे तळाशी ?

उमेश दत्तात्रय वैद्य.

महावार्ता दिवाळी 2021

सन 1922 च्या सुमारास मुळशी धरणाचे काम सुरू झाले. ब्रिटीश सरकारला सोबत घेऊन टाटा सारख्या बलाढ्य व्यापार्‍यांनीं भाग भांडवल उभे करून मुळशीत एक खाजगी धरण उभं केलं..
अन तत्कालीन अभद्र युतीने मावळात असणारा शेतकरी देशोधडीला लागला. आंबेमोहोर भाताची रास असणारा सगळा प्रांत जलमय झाला. गावच्या गाव रिकामी झाली. तळातला शेतकरी आहे ते सोडून डोंगराच्या मध्याला येऊन राहू लागला.
नव्या जोमाने सुरवात करून डोंगराच्या कड्या कपरिला नव्याने भात खाचर करून तयार करुन, पुन्हा भात शेती करु लागला. पुर्वीच्या काळी आज काल सारखी जेसीबी, पोकलंड सारखी यण्त्रे नव्हती ही खाचरे बनविण्यासाठी. केवळ मनुष्य बळ व बैलजोडी यांच्या जीवावर आपल्या मावळ भागातील पुर्वजांनी नवा डाव सुरु केला. आणि आज मुळशीतील इंद्रायणी तांदुळ एक विशेष ओळख निर्माण करुन आपले स्थान बनवुन आहे. मावळातील लोकांनी जरी शेते तयार केली तरी त्यांनी कधी आपल्या शेतांना कुंपणे केली नाहीत. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहांना अनुरुप अशीच नवनवीन भात खाचरे बनविली गेली. मातीची झीज होणार नाही याची देखील दक्षता घेतली गेली. मुळशीतील मावळ भाग पुन्हा एकदा जोम धरु लागला.
अन पुन्हा एकदा, मुळशीला नजर लागली. आपल्याच स्थानिक पुढा-यांनी शहरातील धनदांडग्यांना फार्म हाऊस, रिसॉर्ट्स बनविण्यासाठी, जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी, शेतक-यांच्या जमिनी विकुन त्यातुन मिळणा-या कमिशन साठी, मुळशी विकायला काढला. भातखाचरे जरी शिल्लक असली थोडी फार तरी मुळशीच्या मावळ भागात, डोंगरच्या डोंगर विकले जाऊन, डोंगर-उतारांवर तारेची, भिंतीची कुंपणे पडु लागली. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले गेले. काही ठिकाणी अक्षरशः सुरुंग लावल्यासारखे डोंगर पोखरुन घाढले जात आहेत. यात मातीची होणारी धुप, आपणा सर्वांसाठीच खुप हानिकारक आहे.
ज्या पद्धतीने हे सर्व दिवसा ढवळ्या सुरु आहे, यावरुन असे वाटते की या सर्वांस प्रशासनाचा अंतरंग पाठींबा आहे. तलाठ्यांनी अशा अनधिकृत उत्खणनाबाबत योग्य ते पंचनामे करुन, त्वरीत हे सारे थांबविणे गरजेचे होते पण असे कुठेही होताना दिसत नाही. याला साथ मिळते ती स्थानिक जमीन एजंटांची. आणि कित्येकदा हे जमीन एजेंट गावाचेच प्रतिष्टीत गावकरी असतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पद भुषविणारे पुढारी असतात.


जैव विविधता व पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात विकसनाचे जे काही कायदे आहेत त्यांची सर्रास पायमल्ली होताना दिसते आहे. निसर्गाची अपरीमीत हानी यामुळे होत आहे सोबतच आपल्या मावळ भागातील पुढच्या पिढ्यांचे भविष्य देखील आपण अंधकारमय करुन टाकीत आहोत.
ज्याप्रमाणे आप ला भुप्रदेश जैव विविधतेच्या व पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आहे त्याच प्रमाणे आपण सर्वांनी देखील संवेदनशील होणे आज काळाची गरज आहे. ज्यांच्या जमिनी अद्याप विकलेल्या नसतील त्यांनी क्षणीक मोहास बळी न पडता, आपापल्या पुर्वजांचा हा वारसा जपुन ठेवा. असे केले तरच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या आदरास आपण पात्र ठरु.

गावांचे गावपण गेले आहे. गावे भकास होत चालली आहेत. वयस्कर आई-वडीलांस, आजी आजोबांस शहरातील कोंडाड्यात राहण्याची सवय नसल्याने तेवढेच हे वृध्दच काय ते गांवात राहिले आहेत. गावांत तरुण दिसत नाहीत. ते एकतर शहरात रिक्शा चालवितात किंवा एख्काद्या हॉटेलात काम करतात. पैसा हेच सर्वस्व मानणा-या या पिढीला पुन्हा गावाकडे आणावे लागेल.व यासाठी आपल्या भागाचे वैशिष्ट्य ओळखुन रोजगाराच्या नवनवीन, आधुनिक संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. पैसा आवश्यक आहेच पण तोच झोपडपट्टीत राहुन कमाविण्यापेक्षा , जर खुल्या आकाशाखाली, निसर्गाच्या सानिध्यात, पर्यावरणाचा संमतोल राखुन कमाविता आला, भलेही तो शहरातील हमाली करुन मिळविण्यापेक्षा कमी का असेना, पण तो भलतेच समाधान देऊन जाईल.
हे असंच राहील तर येत्या दहा वर्षात पुन्हा मावळताला शेतकरी देशोधडीला लागला तर आश्चर्य वाटायला नको. पण होणारा अनर्थ आपण अजुनही टाळु शकतो. जागे होऊ शकतो. आपल्या संवेदना जाग्या करु शकतो. प्रशासनास जागे करु शकतो. लोकांस जागे करु शकतो.
उमेश दत्तात्रय वैद्य.
(पवार औषधराव)शेडाणी (दत्तवाडी), ता. मुळशी, जि. पुणे.
9822786866 9373004180

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close