पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली.
पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.
महिलांची दमदार कामगिरी
महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व ४ गुणांनी (२४-२०) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.