ध्येयनिष्ठ, अखंड, एकाग्र सरावाचा अविचल खेळाडू संजू सॅमसन, लेखन-दत्ता आफळे

दत्ता आफळे

जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा ते सहसा स्टेडियमपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासाने सुरुवात करतात पण माझ्यासाठी, ही जी की सगळ्यांसमोर आलीये ती माहिती ही नाहीये. माझी सुरुवात नेहमीच भल्या पहाटे बसने सुरू व्हायची. मी अकरा वर्षांचा होतो त्यावेळी माझी किट बॅगसुद्धा माझ्या वजनापेक्षा जड असायची ती बॅग घेऊन मी सूर्योदयापूर्वी माझे विझिंजममधले घर सोडायचो, दोन बसेस बदलत सकाळी ६ वाजता मेडिकल कॉलेजच्या मैदानावर मी पोहोचायचो. काही काही वेळा मला झोप येत असायची तर काही दिवस सततच्या सरावाने अंग दुखत असे, कधी कंटाळा येत असे. पण मला आठवत नाही की कधी या कारणांमुळे मी माझा सराव चुकवलाय. किंबहुना तो सराव चुकवायचा विचारही माझ्या मनात कधी म्हणजे कधीच आला नाही.

सरावानंतर, मी मैदानाच्या कोपऱ्यात असलेल्या एका लहान नळाखाली आंघोळ करायचो. तिथे ड्रेसिंग रूम वगैरे तसलं काहीही नव्हतं. होते ते फक्त नळाचे थंड पाणी आणि मी माझ्या बॅगेत आणलेला एक टॉवेल. माझा शाळेचा गणवेश तिथेच झटपट बदलल्यानंतर मी सेंट जोसेफला जाणाऱ्या दुसऱ्या बससाठी स्टॉपवर चालत जायचो. शाळा, गृहपाठ सगळं तिथेच पूर्ण करत संध्याकाळी नेटसाठी परत ग्राऊंडवर यायचो.
हे माझे आयुष्य होते. दररोजचे, अखंडित, विनातक्रार आणि मीच स्वीकारलेले.
मी हे सर्व त्याग वगैरे म्हणून तसा कधीच उदात्त असा विचार केला नाही. मी फक्त विचार केला- हे तेच आहे जे त्यासाठी, म्हणजे यशासाठी नक्कीच आवश्यक आहे आणि ते म्हणजे सातत्यपूर्ण सराव, अखंड सराव, मेहनतीचा सराव आणि एकाग्र व प्रामाणिक सराव हेच आहे.
माझे आजोबा मच्छीमार होते. त्यांना पाहून मला एक गोष्ट लवकर समजली. समुद्रावर नियंत्रण ठेवता येत नाही. बाहेर जाताना तुम्ही किती तयार आहात किती व्हायला हवे याची तुम्ही फक्त खात्री करू शकता. काही दिवस काही वेळा तुम्ही काहीही न मिळवता रिकाम्या हाताने परतता. पण तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी कालचा अनुभव पुसून विसरून नव्याने उठता आणि पुन्हा कामावर निघून जाता.
हे त्यांच्याबाबत, माझ्या आजोबांबाबत जे माझे निरीक्षण होते ते मला उमगले आणि तेच कायम माझ्यासोबत राहिले.
काही वेळा माझ्या आयुष्यात असे काही टप्पे आले होते की जेव्हा मला वाटायचे की मी माझ्या स्वप्नाच्या – स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ आलोय आणि असेही काही अनुभव मला आयुष्यात अनुभवायला मिळाले की जेव्हा मला माझ्या स्वप्नापासून खूप खूप दूर गेल्यासारखे वाटायचे. एकाकी वाटायचे, संघातून बाहेर पडायला लागायचे, बाहेर बसायला लागायचे. इतरांचे कॉमेंट ऐकणे, बाहेर हसल्यासारखे दाखवत आत स्वतःलाच प्रश्न विचारणे हे सगळं सगळं मी भोगलंय. मी खोटे बोलणार नाही, पण यामुळे मनाला वेदना होतात भावना दुखावतात खरच खूप वाईट वाटते, कारण मीही माणूस आहे.
पण जेव्हा जेव्हा मला नकाराच्या त्या शंका येतात तेव्हा मी माझ्या मनाला मी ग्राउंडवरील त्या छोट्याशा नळाकडे घेऊन परत जातो. त्या बसेसकडे नेतो.
माझ्या सरावाभोवती माझ्या पालकांनी त्यांचे जीवन कसे समरस करून घेतले, त्याच्याशी कसे जुळवून घेतले हे मी पाहिलंय, ते सर्वकाही मी आठवतो आणि
मी स्वतःलाच आठवण करून देतो की हा प्रवास आपण कधीही आरामाच्या अभिलाषेने केलेला नव्हता, अमिषांच्या प्रलोभनावर बांधलेला नव्हता. तो बांधलेला होता ते केवळ सातत्यावर. न चुकता केलेल्या अविश्रांत सरावावर, *मनात येणाऱ्या नकारार्थी भावभावना सीमापार टोलवत, निराशा वेल-लेफ्ट करत, अंगाला लागणाऱ्या अपेक्षाभंगाच्या चेंडूचे वळ लपवत रोजची नव्या शिकवणुकीची सिंगल रन मी न चुकता घेत गेलो.*
जेव्हा मी तिरुवनंतपुरममध्ये खेळतो आणि गर्दीतील मित्र, प्रेक्षक माझ्या नावाचा जयघोष करताना, नांवाने ओरडताना ऐकतो तेव्हा ते मला खूप छान आणि प्रेमाचे आपुलकीचे वाटते. कारण त्यांनी मला फक्त यशस्वी होतानाच पाहिलेले नाही तर मला या उभ्या प्रवासात पडताना त्यातून पुन्हा उभे राहताना आणि उभे राहून उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे.
माझ्या क्रिकेटच्या आयुष्यातील या सर्व घटना त्यांनी जवळून पहिल्या आहेत, माझ्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत.
मी अजूनही विझिंजमचा तोच मुलगा आहे. मला अजूनही त्याच पद्धतीने फलंदाजी करायला आवडते. मी अजूनही घाबरतो. दु:खी होतो पण खचत नाही. मला अजूनही स्वतःला सिद्ध करायचे आहे.
फरक फक्त आता प्रगल्भतेचा आहे, उत्कृष्टतेकडे जाणाऱ्या प्रवासाचा आहे. हा न थांबणारा लढा आहे तो थांबलेला नाही कदाचित कधीच थांबणार नाही. कारण माझ्यासाठी क्रिकेट कधीच प्रसिद्धीसाठी नव्हते.
ते माझे स्वप्न होते आणि ते मी निवडलेल्या क्रिकेटमधील अनेकांपैकी एका स्वप्नाबद्दल होते आणि मी अशी स्वप्ने निवडत राहीन, दररोज. पाठपुरावा करण्यासाठी. – संजू सॅमसन 
See also  स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आज उदघाटन, उदगीर शहर सज्ज