हिंजवडी-वाकडमध्ये आज ऐतिहासिक बगाड सोहळा, काय आहे बगाडाची 389 वर्षांची परंपरा

संजय दुधाणे, संपादक 

महावार्ता विशेष ः म्हातोबाच्या नावानं चांगभलं…पैस..पैसचा गजर व चांगभलं बोला चांगभलंच्या जयघोषाने दरवर्षी हनुमान जयंतीला महाराष्ट्रातील सर्वात मोठी हिंजवडीतील आयटीपंढरी दुमदुमते. बगाड सोहळा पहाणयासाठी पन्नास हजार लोकांची गर्दी उसळते. पुण्यातील हिंजवडी ते वाकड गावातील सारं रस्ते बंद होतात. अशी महाराष्ट्रातील सर्वांत मोठी म्हातोबा देवाची गावजत्रेची बगाड मिरवणूक 23 एप्रिलला हिंजवडीसह वाकड गावात निघणार आहे. खरं तर आता दोनी गावे शहरे झाली आहेत, तरी गावपण कायम राखून बगाड सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा जोपासून आाहेत.

चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हिंजवडी आय टी पार्कमधून श्री म्हातोबा देवाचे बगाड मिरवणूक निघते. 1635 पासून ही बगाड मिरवूणक सुरू झाली. कोरोना काळात पहिल्यांदाच मिरवणूकीत खंड पडला. कोरोना काळ वगळता गेली 389 वर्ष ही परंपरा कायम आहे. हनुमान जयंती आधी ग्रामस्थांचा 10 दिवसांचा उपवास, मुळशीतील बार्पे गावातील जंगलातून शेलाचे आणले जाणारे लाकूड, सुतारकडून बगाडाची उभारणी, जांभुळकर कुटुंबियातील गळकर्‍यांची साखरे कुटुंबियांकडून निवड, हळद लावल्यानंतर गळ टोचणे, गळकर्‍याची वाकडच्या दिशेने बगाडवर मिरवणूक, गळकरी -देवाची भेट, मातंग समाजाचा रक्ताचा टिळा, वाकडमध्ये गळ काढल्यानंतर गळकर्‍याची पूजा व दर्शन असा बगाडावा भरगच्च कार्यक्रमाचा सोहळा रंगतो.
हनुमान जयंतीला दुपारी चार वाजता हिंजवडी गावाठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते. मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे पाऊले वाकड हिंजवडीकडे वळतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पिढी-परंपरागत बगाड उत्सवाची प्रथा पिढ्यांनी जोपासली. वाकड गावठाणातील मंदिराच्या जुन्या गाभार्‍याच्या चौकटीवर सोळाशे पस्तीस असे कोरलेले शिल्प आहे. तेव्हापासूनच बगाड मिरवणूक सुरू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हनुमान जयंतीच्या 10 दिवस आधी देव बसतात. वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या 10 दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही. लग्न, साखरपुडा, वास्तूशांती सारखे कार्यक्रमही होत नाही. या काळात सर्व काही वर्ज्य असते. बगाडाला नैवद्य दाखवूनच उपवास सोडला जातो.
श्री म्हातोबा महाराजांचे मूळ ठाणे हे मुळशीतील आडगाव बार्पे जंगलात आहे. बगाडाच्या शेलाचे लाकूड आणण्यासाठी आडगाव बार्पे जंगलात शेलेकरी ग्रामस्थ दोन दिवस आधी जातात. शेल म्हणजे लाकूड. शेलेकरी म्हणजे बगाडाचे लाकूड आणण्यासाठी पायी गेलेले ग्रामस्थ. बगाडासाठीचे शेले घेऊन शेलेकरी हिंजवडीच्या दिशेने मार्गस्थ होतात. खांद्यावर तब्बल तीस फूट लांबीचे शेले (लाकूड) घेऊन, सुमारे 80 किलोमीटरचा पायी प्रवास करून ते हिंजवडीत दाखल होतात.

श्री म्हातोबा देवाचे अस्तित्व वाकड हिंजवडी या दोन्ही गावात असल्याने दोन्ही गाव मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करतात त्यामुळे बगाडाची उभारणी करण्याच्या मान वाकड- हिंजवडी गावातील सुतार कारागिराचा असतो. पारंपारिक पद्धतीने सुतार व ग्रामस्थांच्या मदतीने बगाडाची उभारणी करण्यात येते.
हिंजवडीत जांभूळकर परिवाराचे तीन वाडे आहेत. दरवर्षी तीन पैकी एका वाड्यातील विवाहित सदस्याची गळकरी म्हणून निवड केली जाते. बगाड मिरवणुकीची तयारी पूर्ण झाल्यावर जमलेल्या ग्रामस्थांसमोर मिरवणूकीच्या अर्धा तास आधी गावचे साखरे पाटील गळकर्‍याच्या नावाची घोषणा करतात. साखरे परिवाराला सहखांदेकर्‍याचा तर हुलावळे परिवाराला काठीचा मान दिला जातो.
हिंजवडी वाकडकरासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्ताने काढलेल्या पारंपारिक बगाड मिरवणुकीला अथांग जनसागर लोटतो. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवाचे बगाड मिरवणूक हे खास आकर्षण असते. हिंजवडी वाकड मध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकर्‍यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूर च्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. मात्र न चुकता सजवलेल्या बैलजोड्या बगाड मिरवणूक रथाला जोडल्या जातात. या पारंपरिक सोहळ्यात स्थानिक भविकांसोबत आयटी अभियंते मोठ्या हिरारीने व स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. त्याच्या मुखातून होणारा म्हातोबाचा जयघोष लक्ष वेधणारा असतो. आता परिसरातील आयटीयन्सनाही या उत्सवाची चांगलीच भुरळ पडली आहे.
पैस… पैसचा जयघोष करत वाजत्र्यांच्या सनई चौघाड्याच्या निनादात गळकर्‍याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात आणण्यात आले. यावेळी त्यास अभ्यंग स्नान घालण्यास महिलांनी गर्दी होते. गळकर्‍याची विधीवत पूजा केल्यानंतर जमलेल्या गावकर्‍यांना हळदी कुंकवाचे लेपण लावले जाते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळकर्‍याला वाजत गाजत होळी पायथ्याजवळ आणण्यात आले. गावठाणातील म्हातोबा व मारुतीरायाचे दर्शन घेऊन गळकर्‍याला होळी पायथ्याला आणल्यानंतर गळ टोचला जातो. सुतार व साखरे पाटील यांना गळ टोचण्याचा मान असतो. तेव्हा हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद तसेच पैस… पैस..व म्हतोबाच्या नावान चांगभल चा जयघोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमून जाते. गळकरी व खांदेकर्‍यांचे पाय धुण्यासाठी व त्यांना पाणी पाजण्यासाठी पाण्याच्या घागरी घेऊन महिला गर्दीतुन वाट काढत असतात. गळकरी बगाड रिंगण मैदानात आल्यानंतर बगाडावर बसविण्यात येते. हजारो भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण घालून त्यास गोलाकार फिरवण्यात येतेे. यानंतर हजारो भाविकांच्या जयघोषात या मिरवणूकीचे वाकडच्या दिशेने प्रस्थान केले जाते.

सूर्यास्ताच्या सुमारास बगाडाची मिरवणुक हिंजवडी गावठाणातून वाकडकडे मार्गस्थ होते. गावठाणातून भूमकर वस्ती, सायकर वस्ती, भुजबळ वस्ती या मार्गे दोन किलो मिटरचे अंतर पार करून हजारो भाविकांसह बगाडाची मिरवणूक वाकड येथील एका शेतात थांबते. तेथे गावातील मंदिरातून आलेल्या श्री म्हातोबा महाराजांची पालखी गळकर्‍याला भेटते. गळकरी व देवाची भेट झाल्यानंतर बगाड वाकड गावठाणातील श्री हनुमान मंदिराच्या दिशेने निघते. हनुमानचे दर्शन झाल्यानंतर चौकात मध्ये मातंग समाजाच्या एका माणसांचा रक्ताचा टिळा गळकर्‍याला लावला जातो. यानंतर बगाड वाकडमधील श्री म्हातोबा मंदिर परिसरात विसावते. गळकर्‍याला मंदिरात आणले जाते देवासमोर गळ काढून पूजा अर्चा केली जाते. पुढे तीन दिवस मंदिरात बसलेल्या गळकर्‍याचे भाविक मनोभावे दर्शन घेतात. दुसर्‍या दिवशी देवाचा छबिना निघतो. या दिवशी काट्याची पालखी निघते. या पालखीत काटे टाकलेले असतात. तिसर्‍या दिवशी आखाड होऊन नाथसाहेबांचा चांगभले चांगभले च्या घोषात म्हातोबा यात्रेची सांगता होते.
See also  पेरीविंकल पुन्हा शंभर नंबरी सोने, 12 वीत 100% निकालाची परंपरा कायम