पोमगावमधील 70 टक्के घरे पाण्याखाली जाणार, पुनर्वसन करणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

महावार्ता न्यूज: मुळशी धरणाची उंची वाढविली तर काही गावांतील रहिवाशी वस्ती पाण्याखाली जाईल.पोमगाव येथील सुमारे सत्तर टक्के घरे पाण्याखाली जातील त्यामुळे तेथील लोकांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील सुंदरबन लॅान्समध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. गेल्या तब्बल पाच वर्षानंतर अजित पवार यांची मुळशीतील ही पहिलीच सभा असल्याने ते या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
मुळशीतील सुतारवाडीच्या पुढे ताम्हीणीला जातानाचा महामार्ग चार अथवा सहा पदरी करावा लागणार आहे. त्यासाठी या रस्त्यालगत बांधकामे करू नका. चांदणी चौक ते ताम्हीणी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कंत्राटदारच बंडलबाज निघाला असल्याचे ना. पवार आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, रणजीत शिवतरे, विलास लांडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे,मुळशी तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे, प्रवीण शिंदे, राजेंद्र हगवणे, सुनील चांदेरे, अमित कंधारे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक उपस्थित होते.

या सभेच्या निमित्ताने तालुक्यातील तटस्थ गट काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागलेले होते. मात्र तालुक्यातील राष्ट्रवादीच्या तटस्थ गटाने अजित पवार यांच्या सभेलाही उपस्थित न राहता तटस्थ भुमिका घेतली.
See also  तहसीलदार रणजीत भोसलेंच्या हस्ते महावार्ता दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन, पिरंगुट ग्रंथालयात रंगली स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाची मैफील